पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली विचारधारा बाजूला ठेवून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला आहे. आज कोणता नेता कुणासोबत आहे हे ओळखणे कठीण झाले असून राज्यात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. निवडून आल्यानंतर अनेक नगरसेवक कोट्यधीश बनले आहेत, अशी टीका आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल यांनी केली.
पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामान्य माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी शिक्षण, आरोग्य सेवा, वाहतूक आणि रोजगार यांचे सक्षमीकरण करणे हे आम आदमी पार्टीचे धोरण असून, दिल्ली आणि पंजाबमध्ये राबवलेले विकासाचे मॉडेल महाराष्ट्रातही अमलात आणले जाईल, असे त्यांनी सांगितले.
आम आदमी पार्टी आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असून शक्य तितक्या सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षाकडे प्रामाणिक व इमानदार कार्यकर्ते असल्याने अनेक नगरपालिकांमध्ये उमेदवार यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री आतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राखी बिडलान हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याची माहिती प्रकाश जरवाल यांनी दिली.
नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे आम आदमी पार्टीच्या उमेदवार शालिनीताई सुखधान या निवडून आल्या असून, त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाचे खाते उघडले आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी दिली.
यावेळी राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
